औरंगाबाद आजाद चौक येथे भीषण आग १७ फर्निचर दुकाने जळून खाक, करोडोंचे नुकसान

औरंगाबाद आजाद चौक येथे भीषण आग – १७ फर्निचर दुकाने जळून खाक, करोडोंचे नुकसान
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
औरंगाबाद – शहरातील आजाद चौक येथे पहाटे भीषण आग लागून १७ फर्निचर दुकाने जळून खाक झाली. या आगीत करोडोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग पहाटे सुमारे ५.३० वाजता लागली आणि काही मिनिटांतच ती भडकली. सर्व दुकानांमध्ये लाकडी फर्निचर असल्याने आगीने वेगाने रौद्र रूप धारण केले.
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आग इतकी भीषण होती की एकाच गाडीने ती नियंत्रणात आणणे शक्य नव्हते. त्यानंतर आणखी चार अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. अग्निशामक दल, पोलिस प्रशासन, महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने काही तासांत आग आटोक्यात आणण्यात आली.
दुकानदार आणि कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट
या घटनेत फर्निचर दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रत्येक दुकानात ३ ते ४ कामगार काम करत असल्याने दुकान मालिकां वगळून जवळपास २०० ते २५० कामगार बेरोजगार झाले आहेत. रमजानच्या पार्श्वभूमीवर ही आग लागल्याने दुकानदार व कर्मचाऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
सरकारी मदतीची मागणी
स्थानिक समाजसेवक आणि नागरिकांनी शासनाकडे आगग्रस्त दुकानदारांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






